शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१०

प........... पर्यटनाचा

रोजच्या कंटाळवाण्या रुटीन लाईफ मधून सुट्टीचे निवांत क्षण सापडताच निसर्गवेड्या पर्यटकाला लागतात ते भटकंतीचे वेध.

दूरवर पसरलेले निळेशार भासणारे डोंगर आणि दऱ्या, समोरून येणारे दाट धुके, मनाला सुखाविणारा हवेतील गारवा, मधूनच अंगावर पडणारी सूर्याची कोवळी किरणे, सभोवताली ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, बाजूनेच खळखळ करत वाहणारी नदी.............. असे मंत्रमुग्ध करणारे वातावरण एन्जॉय करताना आपला स्ट्रेस कधी दूर झालाय हे आपल्याला कळत देखील नाही.

उन्हाळ्याची सुट्टी आणि पर्यटनस्थळे यांचे समीकरण पक्के असताना मात्र गेल्या काही वर्षांपासून याला जागतिक मंदीचा तडाखा बसला आणि त्यास दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट मालिकांची जोड मिळाली. या सर्वांचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला. परदेशी पर्यटकांनी, त्यांच्या वकिलातीने भारतात न जाण्याच्या इशाऱ्याने आपला भारत दौरा रद्द केला तर आपल्या पर्यटकांनी थोडी सबुरी बाळगून काही कालावधीनंतर सहलीवर जाण्याचे ठरविले. त्यामुळे आपल्याकडील लोकप्रिय पर्यटनस्थळांवरील गर्दी रोडावत गेली. नाही म्हणायला एखादा लाँग वीकेंड आला तर आपला दर्दी पर्यटक, आपल्या व्यस्त जीवनक्रमाला थोडेसे बाजूला सारून, दोन- चार दिवसांकरता जवळपासच्याच ठिकाणी जावून दुधाची तहान ताकावर भागवत होता.

पाहता पाहता २०१० साल सुरु झाले ते मंदीचे मळभ दूर होऊ लागलेय या शुभवार्तेसह. अचानक गेल्या दोन- तीन वर्षांमध्ये पर्यटनक्षेत्रामध्ये जी मरगळ आलेली होती ती दूर होताना दिसतेय. सहल आयोजकांकडे आता आपल्या उन्हाळी सुट्टीचे नियोजन करवून घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी उसळू लागलेली दिसतेय. त्यांच्याकडील फोन सतत घणघणु लागलेले आहेत आणि ई-मेल ने त्यांचे मेल बॉक्स भरून जात आहेत.

रेल्वेचे आगाऊ आरक्षण ९० दिवस आधी सुरु होत असल्यामुळे आधी ते करवून घेण्याकडे पर्यटकांचा कल आहे. रेल्वे आरक्षण करताना असे समजले कि आरक्षण फुल झालेय आणि भली मोठी वेटिंग लिस्ट दिसतेय तर आता तत्काळ तिकिटासाठी २ दिवस आधी वाट बघण्याची किंवा सहलीचा बेत रद्द करण्याची गरज नाही कारण आता आपल्याकडे विमान प्रवास करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. विमान कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे आता त्यांच्यामध्ये "किंमत युद्ध" सुरु झालेय आणि कमीत कमी दरात तिकिटे उपलब्ध होत आहेत. मुंबई ते दिल्ली हा विमानप्रवास तर अडीच- तीन हजारच्या घरात आलाय. त्यामुळे कमीत कमी वेळेत, कमी तिकीट दरात, आरामदायी प्रवास करण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे काही पर्यटक तर हल्ली चक्क रेल्वे आरक्षणाला पहिली पसंती देण्याऐवजी विमान प्रवासाला देत असल्याचे चित्र दिसू लागलेय.

अनेक सहल आयोजकांनी निरनिराळ्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी विविध आकर्षक पेकेजेस आखली आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे बरेच सहल आयोजक कमी सहल खर्चात आरामदायी आणि झकास अश्या पैसे पुरेपूर वसूल करणाऱ्या सहली करण्याच्या ऑफर्स देत आहेत. अगदी भारतीय रेल्वेचा उपक्रम असणाऱ्या आय.आर.सी.टी.सी. ने देखील यामध्ये प्रवेश केलाय आणि कमी सहल खर्चात रेल्वे प्रवासासह सहली आयोजित करणे सुरु केलेय.

सध्या उन्हाळी सुट्टीसाठी पर्यटकांची पसंती हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख तसेच दक्षिणेकडील उटी- कोडाईकनाल- मुन्नार- येरकोड ला मिळतेय. थोडे लांब असले तरी निसर्गरमणीय असल्याने काही जण दार्जीलिंग- सिक्कीम ला देखील जायचे ठरवत आहेत. काही दिवसांमध्ये पुन्हा दहशतवादी कारवाया सुरु झाल्यामुळे या सगळ्यांमध्ये काश्मीर मात्र काहीसे मागे पडताना दिसतेय.

अशा उत्साहपूर्ण वातावरणात पर्यटन क्षेत्राचा 'कुंभमेळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी. टी. एफ. हा तीन दिवसीय पर्यटन मेळा वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेस येथे नुकताच पार पडला. या मेळ्यासाठी संपूर्ण भारतातून तसेच परदेशातून नामांकित हॉटेल्स आणि तेथील पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी मुंबईत आले होते. या मेळ्यामध्ये मुंबईतील सहल आयोजकांना तसेच पर्यटकांना त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून त्यांच्या प्रदेशातील पर्यटन आणि स्थळदर्शन याविषयी अधिक माहिती प्राप्त झाली तसेच तेथील नवीन प्रेक्षणीय ठिकाणांविषयी अधिक जाणून घेता आले.

चला तर मग.... पर्यटनातील आनंद अनुभवायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. ही चालून आलेली सुवर्णसंधी दवडू नका. रोजचा कामाचा व्याप, चिंता, व्यग्र जीवनक्रम सगळे सगळे विसरून जा आणि निसर्गाच्या कुशीत शिरायला तयार व्हा.

रेडी? गेट सेट गो..........

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१०

युवराज

तो आला... त्याने पाहिले... आणि तो जिंकला.... असेच काहीसे राहुल गांधी यांच्या मुंबई भेटीबाबत आपल्याला म्हणता येईल. वाद- प्रतिवाद यांच्या उडालेल्या धुराळ्यात राहुल गांधी यांचा मुंबई दौरा यशस्वी झाल्याचे चित्र दिसले. परंतु आपले राज्यकर्ते दिल्लीश्वरांसमोर किती आणि कसे लाजिरवाण्या पद्धतीने झुकतात हे देखील सगळ्या जनतेने पाहिले. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे प्रश्न न सोडवता आपली सगळी कामे सोडून आपल्या पक्षाच्या सरचिटणीस यांच्या समोर कसे लाजीरवाण्यासारखे दिवसभर बसून होते हे देखील दर्शन घडले. जनतेने आपल्याला त्यांच्या समस्या सोडवण्याकरता निवडून दिल्याचेही भान त्यांना राहिलेले दिसत नव्हते. आपल्या राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांनी तर राहुल गांधी यांचे जोडे उचलून आपल्या हुजरेगिरीचे दर्शन घडवले.

खरे पाहता या दौरयाला इतके महत्व देण्याची मुळीच गरज नव्हती पण शिवसेनेने दिलेले आव्हान बघून मग सरकारला पण स्फुरण चढले आणि आपल्या करदात्याच्या पैशांचा चुराडा करण्यात आला. जणू काही राज्याच्या सगळ्या समस्या- प्रश्न अगदी सगळे संपले असल्यासारख्या थाटात सरकारी मंडळी वावरत होती.

आपण जर नीट बघितले कि आपल्याला असे लक्षात येईल कि गेली २-३ वर्ष अगदी ठरवून राहुल गांधी यांच्यासाठी मार्केटिंग केले जातेय अर्थात हे सर्व सत्तारोहण करण्याच्या दिशेनेच उचललेली पावले आहेत. आता खरे तर मनमोहन सिंग यांच्यासाठी धोक्याचीच घंटा वाजायला लागलेली आहे. फारफार तर २ वर्षांमध्ये राहुल गांधी यांचे पंतप्रधान बनणे निश्चित आहे.

मध्यंतरी राहुल गांधी यांनी दिल्ली मध्ये मेट्रो रेल्वे ने प्रवास केला आणि लगेच त्याची बातमी झाली. आपण अतिशय साधे आहोत आणि आपल्यायला सर्व सामान्यांच्या प्रश्नांविषयी जाण आहे आणि त्याबद्दल आपल्याला काहीतरी ठोस करायचे आहे असे ते सतत भासवत असतात. अशाच तऱ्हेने त्यांनी मध्यंतरी विदर्भातल्या कलावती यांची भेट घेतली आणि त्या संबंधी लोकसभेत भाष्य केले आणि शेतकऱ्यांच्या आत्म्हत्यांविषयी आपल्याला किती हळहळ वाटते हे त्यांनी दाखवून दिले.

काही दिवसांपूर्वी बिहार येथील एका सभेत बोलताना त्यांनी मुंबईला बिहारी आणि उत्तर प्रदेशातील कमांडोनी वाचवले असे एक धक्कादायक विधान केले. आणि त्यांना काही दिवसानंतर मुंबईत जायचे आहे हे पक्के माहित होते पण तरीदेखील त्यांनी हे जाणून बुजून हे विधान केले असावे कारण त्यामुळे आपण आणि प्रसिद्धीच्या शिखरावर जावून पोहोचणार आहोत याची त्यांना खात्री होती. ह्या सगळ्या चाली ते अगदी बुद्धिबळातील पट समोर रचून ठेवल्यासारख्या खेळतात आणि त्याचे निश्चित परिणाम काय होतील हे त्यांना पक्के माहिती असते. आपण केलेल्या विधानाची काय प्रतिक्रिया उमटेल हे त्यांना पुरेपूर माहिती होते आणि महाराष्ट्रात आपलीच सत्ता असल्यामुळे आणि शिवसेना आता पूर्वीसारखी भेदक राहिली नसल्यामुळे आपला दौरा सुरळीतपणे पार पडून आपण देशवासीयांच्या मनात हिरो बनू हा त्यांचा अंदाज होता आणि तो खरा ठरला देखील.

भाईदास सभागृहातील कार्यक्रम आटोपल्यानंतर अचानक त्यांनी अंधेरी स्टेशन गाठले आणि तिथल्या एका ए.टी.एम. मधून पैसे काढले आणि रांगेत उभे राहून अंधेरी ते घाटकोपर वाया दादर असे तिकीट काढले आणि लोकलने त्यांनी तो प्रवास केला (त्यांनी एकट्याचेच तिकीट काढले आणि बाकीच्या जणांनी तो प्रवास फुकटच केला. हे वरकरणी अचानक झाले असे दर्शविले असले तरी तसे ते नसावे. या प्रवासाची संपूर्ण कल्पना स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप च्या कमांडोंना असलीच पाहिजे नाहीतर त्यांनी हा प्रवास होऊनच दिला नसता. हा स्टंट राहुल गांधी यांनी लोकप्रिय होण्यासाठीच केला.

जणू काही आभाळच कोसळलेय अश्या थाटात सर्व पोलीस दलास बंदोबस्ताच्या कामास जुंपले गेले. लोकशाहीमधील निषेध करण्याचाही अधिकार डावलला गेला. संपूर्ण सरकार अगदी लाचार झाल्यासारखे वाटत होते. यामुळे संपूर्ण दिवसभर सर्वसामान्य करदात्या जनतेस खूपच त्रास सहन करावा लागला. पण काय करणार? 'आले युवराजांच्या मना.... तिथे कोणाचेच चालेना'

आता फक्त तारीख आणि मुहूर्त काढणेच शिल्लक आहे... बाकी युवराजांचा राज्याभिषेक होणे नक्की झालेय......

काउंटडाउन तर कधीचेच सुरु झालेय.......

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०

अनाम प्रेम......

आपल्या मुंबईकरांचे रोजचे आयुष्य खूप धावपळीचे असते. आपण जणू स्वतःला घड्याळ्याच्या काट्यालाच बांधून घेतलेले असते. सकाळी लवकर उठायचे म्हणून आपण सहा वाजताचा गजर लावून ठेवतो. सकाळी ठरल्या वेळेला गजर वाजतो आणि तो आपण सवयीप्रमाणे हात लांब नेऊन बंद करून टाकतो आणि मग झोपेतच विचार करतो (झोपेत विचार फक्त मुंबईकरच करू शकतो हा...) कि आणखी पाच ते दहा मिनिटे झोप काढू आणि तसेच झोपून जातो आणि आपल्याला जेव्हा जाग येते तेव्हा ७ वाजलेले असतात आणि मग सुरु होते ती धावपळ. डोळ्यासमोर ९.१७ ची गाडी दिसत असते आणि आपल्याला नक्की काय करावे तेच सुचत नसते. घाईघाईत आपण सगळे आवरतो आणि मग स्टेशन च्या दिशेने पळत सुटतो. उपनगरामध्ये रहात असल्यामुळे स्टेशन ला जाण्यासाठी आपण रिक्षा करतो. खूपच उशीर झाला तर मग स्वतंत्र रिक्षा नाहीतर मग शेअर रिक्षा.
एक दिवस असाच मला उशीर झाला होता. घाईघाईतच मी रिक्षा पकडली. आधीचे ३-४ रिक्षावाले नेहेमीच्या सवयीप्रमाणे यायलाच तयार नव्हते शेवटी एक यायला तयार झाला. मी रिक्षात बसलो आणि रिक्षा स्टेशन च्या दिशेने निघाली. सहज समोर माझी नजर गेली. रिक्षावाल्याच्या सीट च्या मागे एक स्टीकर चिकटवला होता. त्या स्टीकर वर मोठ्या अक्षरात लिहिलेले होते ' अनाम प्रेम'.

मी उत्सुकतेने पुढे वाचायला सुरुवात केली. त्या स्टीकर वर काही मजकूर होता. त्यावर असे लिहिलेले होते कि मी प्रतिज्ञा करतो कि ' रिक्षावाल्याला अरे असे न म्हणता अहो असे म्हणून मी हाक मारीन, रिक्षातून खाली उतरताना रिक्षाचालकाला धन्यवाद असे म्हणेन, पैशांच्या देवाण- घेवाण करताना होणाऱ्या शुल्लक (?) वादात पडणार नाही. कटू गोष्टींचा त्याग करीन आणि सदैव चांगलेच बोलीन... इत्यादी इत्यादी. तो स्टीकर वाचत असतानाच मला अचानक तंद्री लागली. आणि मला अचानक सर्वच रिक्षाचालक मला अतिशय सौजन्याने प्रवाश्यांशी वागताना दिसू लागले. ते अतिशय स्वच्छ गणवेशात प्रवाश्यांशी हसून आलेले भाडे न नाकारता त्यांच्या इच्छित स्थळी नेत असल्याचे दृश्य दिसू लागले. आपली रिक्षा अगदी वाहतुकीचे सर्व नियम पाळून आतल्या प्रवाश्याला अजिबात त्रास न होता मुखी नामस्मरण करत चालवताना दिसायला लागले. प्रवास संपल्यावर मीटर प्रमाणे अगदी अचूक भाडे घेताना दिसू लागले आणि प्रवाश्यांना उरलेले सुट्टे पैसे अगदी हसतमुखाने देऊन त्यांना शुभेच्छा देत असल्याचे दिसू लागले. आणि अचानक एका मोठ्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली. बघतो तर काय मी ज्या रिक्षामध्ये बसलेलो होतो त्याने अगदी कोणीतरी मध्ये आल्याने (त्याच्या भाषेत कोणीतरी तडमडले) अगदी करकचून ब्रेक मारला होता. माझ्या रिक्षाचा चालक त्या व्यक्तीच्या अगदी दणदणीत उद्धार करत होता आणि मधूनच पानाची पिचकारी मारून रस्त्याला शोभा आणत होता. शेवटी एकदाची त्याने माझी रिक्षा पुढे नेली. मी रिक्षातून उतरताना १० रुपयांची नोट त्याला दिली कारण रिक्षाभाडे ९ रुपये झाले होते आणि त्याच्याकडे द्यायला १ रुपया नव्हता (विश्वास बसेल?). लोकलची वेळ झालेली होती त्यामुळे मला त्यावर पाणी सोडून द्यावे लागले. काय करणार मग?

प्लेटफोर्म वर जात असताना माझ्या मनात बराच वेळ अनाम प्रेम हा विषय घोळत होता. अचानक माझ्या मनात एक विचार चमकून गेला कि याला खरच अनाम प्रेम म्हणावे का? हि हे एकतर्फी प्रेम आहे? कारण रिक्षाचालकांशी कसे वागावे, कसे बोलावे याविषयी फक्त आपल्यासारख्या प्रवाश्यांनाच उपदेशाचे बोध पाजण्यात आलेले आहेत आणि रिक्षाचालकांना? त्यांना हे लागू नाही का? मग हे अनाम प्रेम कसे होईल? हे तर एकतर्फीच प्रेम झाले ना?

तुम्हीच सांगा कि तुम्हाला काय वाटते?